Showing posts with label उगीच. Show all posts
Showing posts with label उगीच. Show all posts

27 January, 2011

नापास (न झालेल्या) मुलीची गोष्ट

"नापास होणं" यात चर्चा करण्यासारखं काय असतं - ते मला अजुन समजलेलं नाही! एखाद्या दिवशी आईनं केलेल्या पोळ्या चिवट झाल्या किंवा एखाद्या कोकणातल्या मुलीनं "मकई की रोटि, सरसोंका साग" वगैरे पहिल्यांदाच बनवलं आणि ते पुर्णपणे फसलं - तर आई आणि ती मुलगी नापास की काय?! नाहीच! कारण पोळ्या चिवट व्हायला नीट न दळलेल्या कणकेपासुन ते बर्नरची आच नीट न असणं अशा कित्येक गोष्टी कारणीभूत असू शकतात. तसचं त्या बिचार्या कोकणकन्येला आमसुलाच्या साराची सवय, तीला कसं लगेच "मकई की रोटि, सरसोंका साग" जमणार? तसंच आहे! १०० पैकी मार्क द्यायचे ठरवले तर त्या चिवट पोळ्यांनाही कदाचित ३५ मिळायचे नाहीत! after all, in the world of relative grading...! :)

आमच्या घरात मात्र "पास"/"नापास" ह्यावर इतर बर्याचशा घरांप्रमाणेच चविष्ट चर्चा मी नेहमीच बघत आले आहे. मग ती मी शाळेत असतानाची असो किंवा माझी भाची आत्ता शाळेत असतानाची असो! विषय आणि मुद्दे तेच! पास/नापास एकवेळ समजु शकतो माणुस कारण असे टप्पे माणसाच्या आयुष्यातली प्रगती (नक्की कसली?) दर्शवितात (म्हणे!). पण, साडे नव्याण्णव मार्क का मिळाले (अहो, म्हणजे १०० का नाहीत)? - अशा गोष्टी म्हणजे जरा जास्तच नाही का? या आणि अशा कित्येक प्रश्नांच्या सरबत्तीला मी तोंड दिलेलं आहे आणि माझी भाचीसुद्धा तोंड द्यायला हळुहळु शिकत आहे! असो!

माझ्या सुदैवाने(च म्हणावं लागेल), मला "पास/नापास" ला कधी तोंड द्यावं लागलं नाही. माझं शिकत असताना एक तत्व .. आरे बापरे.. नाही म्हणजे साधाच नियम म्हणा.. होता. तो म्हणजे - "परिक्षेचा फडशा पाडायचा". मला अभ्यास करायला, पेपर लिहायला, उत्तरं अधोरेखित करायला वगैरे वगैरे इतकं प्रचंड आवडायचं की ठरवूनदेखील मी शाळा-कॉलेज च्या परिक्षामध्ये कधी नापास झाले नसतेच बहुतेक! त्यामुळे एका प्रकारच्या प्रश्नांच्या सरबत्तीमधुन माझी सुटका झाली! पण त्यामुळे असं व्हायचं की - "एव्हढा चांगला अभ्यास करतेस, आणि काय ग आयत्या वेळेस अशा चुका करतेस - थोडं अजुन वाचलं असतंस, पाठ केलं असतंस, तर पैकीच्या पैकी मिळाले असते" अशा कॉमेंट्सना मात्र सामोरं जावं लागायचं. कोणी विशेषतः गणिताच्या बाबतीत मला असं म्हणालं की - "गणित बरोबर आहे पण मधल्या २ स्टेप्स खाल्यास! नाहीतर पैकीच्या पैकी मिळाले असते" - की मला एव्हढा प्रचंड राग यायचा! मला वाटायचं - त्या स्टेप्स काय लिहयच्या! - किती सोप्प्या आहेत त्या! शिक्षकांना तर कळेलही तेवढं!! अशा न आवडण्यार्या गोष्टी न केल्यामुळे जे काही मार्क्स जायचे तेवढ्याची बोलणी मात्र यायची वाट्याला!

पण "नापास" या शब्दाने खरंतर माझ्या आयुष्यात प्रवेश केला होता. पण तो खोटा-खोटा! म्हणजे - चौथीत असताना, शिष्यवृत्तीच्या सराव परिक्षेत, मी एकदा मजाच केली होती! म्हणजे बाईंनी सांगितलं पेपर-अ सोडवा आणि मी (झोपेत!) सोडवला पेपर-ब! झालं! MCQ असल्यामुळे पेपर चेक करताना फक्त पर्याय तपासले गेले आणि मी १०० पैकी २० मार्क्स मिळवुन चक्क नापास झाले! एकदम "नापास" असा मानसिक धक्का बसल्यामुळे (किंवा लोकांनी दिल्यामुळे) मी भोकाड पसरलं आणि नंतर माझ्या बाईंनाच शंका आली आणि सगळा उलगडा झाला!

असं एकमेव खोटं "नापास" सोडलं तर लोकांच्या दृष्टीनं महत्वाच्या अशा कुठल्या परिक्षेत नापास झाले नाही मी. मला नेहमी वाटायचं, कसं वाटत असेल नापास झालं तर? खरंच का ती आयुष्य संपवण्याइतकी लाजिरवाणी गोष्ट आहे? हळुहळु मला जाणवलं की लोकांकडुन नेहमीच "नापास" ही जाणीव करुन दिली जाणारच! आपण १०० % दिले असतील तर कुठलीच गोष्ट मनावर घ्यायची गरज नसते!

मजा म्हणजे - या कधीच नापास न झालेल्या मुलीबद्दल सगळ्यांना भारीच विश्वास निर्माण झाला होता आणि दुर्दैवानं तो "अभ्यास / शिक्षण" या पलिकडे गेला होता! म्हणजे ही "नापास" न झालेली मुलगी सगळीकडेच पास च होत राहणार असा दुर्दम्य (उगिच!) विश्वास! आणि त्यातच ती नापास झाली! कशात माहितिए? - चारचाकी गाडी चालवण्याच्या परिक्षेत! आणि तिथच तिला कळलं - की - ती आजवर कधी नापास झाली नाही कारण आजवर तिनं तिच्या मनासारखं केलं - मनाविरुद्ध केलेली / शिकलेली ही एकच गोष्ट - चारचाकी चालवायला शिकणं! अजुनही कोणी मला म्हटलं की घे आता चारचाकी आणि त्यातुन जा ऑफिसला - की मला ऐकुनच कंटाळा येतो.

theoretically मात्र आई.आई.टी. मध्ये कित्येक वेळा आम्ही "नापास" झालेलो आहोत! मग ते CS601 मधले 17/70 असोत किंवा अतिप्रसिद्ध CS636 मधले 5.5/35 असोत! ते मार्क्स घरी सांगायची वेळ आली नाही म्हणुन ठीक, नाहितर बोलणी अटळ होती! पण त्या 5.5 किंवा 17 मध्ये प्रचंड मजा होती! कधी कधी तर 5.5 हेच सर्वोत्तम मार्क्स असायचे! तेव्हा तर आनंद गगनात मावत नसे! :D अशा वेळी तर "नापास" हे गावीही नसायचं कोणाच्या!

पण जवळ्जवळ १२-१४ वर्षांनीदेखील माझ्या भाचीला त्या आणि तशाच प्रकारच्या प्रश्नांना तोंड द्यावं लागतंय म्हणजे खरंच कठीण आहे! "परिक्षा" आणि 'मार्क्स" या जगात हरवलेल्या लोकांमध्ये राहणारया एखाद्याला, ज्याचं/जिचं माझ्यासारखं परिक्षेवर प्रेम नाही आहे - अशांसाठी हे किती त्रासदायक ठरेल!

24 April, 2010

आम्ही (होऊ घातलेले) उच्चवर्गीय अर्थात माजी(?)-मध्यमवर्गीय!

गेल्या काही दिवसांपासून मी "पैसे बचाव" अभियान सुरु केलंय. अर्थात अभियान म्हटलं असलं तरी त्याची व्याप्ती माझ्यापुरतीच आहे. म्हणजे काही गोष्टींमध्ये पैसे उगीचच खर्च करायचे (की उडवायचे?) नाहीत असा नियमच बनवून टाकलाय. उदाहरणार्थ - बऱ्याचवेळेस बाहेरचं खाल्लं जातं - त्याला काटछाट - किंवा एखादी आवडलेली वस्तू (बऱ्याचदा) गरज नसली तरी घेतली जाते तसं न करणं वगैरे. एक साधारण मध्यमवर्गीय, म्हणजे खाऊन पिऊन सुखी कुटुंब लक्षात घेतलं तरी कित्येकदा त्यामागे त्याकरिता आई-बाबांनी केलेल्या अडजस्टमेंट्स असतात. जसं जसं आपण अधिकाधिक स्वतंत्र होऊ लागतो, स्वत:च्या पायावर उभे राहतो आणि बऱ्याचवेळेस या गोष्टीने समाधानी असतो की आता आपल्या पालकांना आपल्यासाठी खर्च करावा लागत नाही; त्याच आनंदात आणि उत्साहात आपण कदाचित थोडा जास्तच खर्च करू लागतो! म्हणजे आज काल थोड्याफार फरकाने असंच दिसून येतं की, साधारण पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण झालं की रग्गड पगाराची नोकरी - मग ती कुठेही असो - आणि मग त्यासोबत आलेलं financial freedom. २५-२६ व्या वर्षी जेव्हा आपली आधीची पिढी नोकरीने स्थैर्य आलं की संसार थाटायची तिथे आपल्या पिढीतले बहुतांश लोक घर किंवा गाडी मध्ये फक्त स्वतःच्या हिमतीवर गुंतवणूक करू लागले - अशी गुंतवणूक आपल्या आधीच्या पिढीने over the years केलेली दिसते. अगदीच एखादा नोकरी ऐवजी शिकत असला तरीदेखील ज्या तुलनेत आपल्या आधीच्या पिढीतल्या लोकांना पैशाचा स्वातंत्र्य असे, त्यामानानं आपल्या पिढीला खूपच जास्त आहे.

माझ्या स्वतःच्याच बाबतीत मी याचं विश्लेषण केलं. घरी असायचे तेव्हा रोज नेहमीचं पोळी-भाजी-भात आमटीचं जेवण - केव्हा केव्हा चटणी/कोशिंबीर/पापड.. सणासुदीला पक्वान्नं आणि कोणी पाव्हणे असले तर काही विशेष.. म्हणजे फार फार तर पुलाव / बिर्याणी अशा व्हरायटीज किंवा पोळीऐवजी एखाद वेळेस पुरी.. पाव भाजी किंवा पिझ्झा किंवा तत्सम पो.भा. प्रकारात न मोडणारे so-called one dish meal म्हणजे डोक्यावरून पाणी. पण जे काही जेव्हा केव्हा केला जायचं त्यात काय मजा असायची! म्हणजे मला आठवतंय, असाच घरी एकदा काहीतरी समारंभ होता आणि मला काकडीच्या कोशिंबिरीसाठी काकडी कोचायचं काम दिलेलं! मला काकडी कोचायाला फार आवडतं :D त्यामुळे साहजिकच मी ते अगदी मन लावून करते. तेव्हा माझी आजी प्रत्येक येणाऱ्या-जाणाऱ्याला सांगत होती - बघा, किती छान कोच्तेय काकडी - अगदी बारीक, कुठेही मोठ्या फोडी उरल्या नाहीएत - वगैरे वगैरे.. :D तसंच एकदा फ्रुट-सलाड करताना जी फळांची टरफलं आणि साली फेकून दिलेल्या त्यात कुठलीशी चीजवस्तू (कात्री किंवा सुरी वगैरे) देखील फेकून दिली गेलेली - म्हणजे ती वस्तू काही नंतर सापडली नव्हती :D असो! तेव्हा खरोखर असेल त्यात समाधान मानण्याची वृत्ती होती. नशिबाने अजून देखील घरातले लोक तसेच आहेत - मृगजळामागे न धावता, आहे त्यात सुखात राहणारे; पण मग कधी कधी मीच बदललेय की काय असं मला वाटू लागतं!

घरापासून दूर राहायला लागल्यावर एक गोष्ट फार अंगवळणी पडू लागते - ती म्हणजे आपण एकटे पडू लागलोय असं वाटलं की कितीही नापसंत लोकांसोबत जुळवून घ्यावं लागतं - म्हणजे एकटेपणापेक्षा ते बरं - असं! मग कधी त्या मित्रांच्या आग्रहाखातर म्हणा किंवा आपल्यालाच सवय होऊन जाते म्हणून म्हणा - आपण खूप पैसे उडवू लागतो - म्हणजे वाढदिवसाच्या सेलिब्रेशन पासून ते नोकरीच्या सेलिब्रेशनपर्यंत. आज काल जसं लहान मुलांच्या ग्रुप्समध्ये बर्थडे गिफ्ट आणि रिटर्न गिफ्ट अशी एक प्रथा (?) निर्माण होऊ घातलीये, तसंच काहीसं आपल्याही बाबतीत होतं. म्हणजे २ ऑप्शन्स असतात. पहिला म्हणजे आपल्या मनाविरुद्ध (बऱ्याचवेळेस)- "त्याने नाही का त्याच्या बर्थडेला मोठ्ठी पार्टी दिली? मग मला द्यायला नको का?" असं कारण देवून आपण हे आपल्या अंगवळणी पाडून घ्यायचं; आणि दुसरा ऑप्शन म्हणजे या सगळ्यापासून चार हात दूर राहायचं. मी दुसऱ्या मार्गाचा अवलंब कित्येक वर्षं केला; मध्ये काही वर्षं पहिल्या मार्गाकडेदेखील वळले पण लवकरच दुसरा मार्गचं योग्य वाटू लागला आहे पुन्हा एकदा. याचं कारण माझं मी केलेलं विश्लेषण. अगदीच ढोबळमानानं सांगायचं झालं तर फक्त मेसच्या जेवणाचा कंटाळा म्हणून मी कित्येक वेळा बाहेरच खाते. पण मग त्यातही बऱ्याच वेळेस भुकेपेक्षा जिभेचे चोचले पुरवणचं अधिक होऊन बसतं! म्हणजे असं लक्षात यायला लागलं कि मेस मध्ये नको म्हणून बाहेर एखाद्या ठिकाणी पोळी-भाजी मिळत असूनदेखील मी पिझ्झा ऑर्डर करू लागले. यात खर्चदेखील वाढला. काही महिन्यांपूर्वी जेव्हा मला मी १.५ महिन्यात जवळ जवळ २००० रुपये फक्त खाण्या-पिण्यावर खर्च केले असं लक्षात आलं तेव्हा फार अपराधी वाटू लागलं. आणि तेव्हा लक्षात आलं कि मी कळत-नकळत पहिल्या मार्गाचा अवलंब केला होता - सवयीनं! म्हणून मग पैसे बचाव या नावाखाली पुन्हा एकदा एक balanced आयुष्य सुरु करायचं ठरवलं.

मला खात्री आहे की प्रत्येक असा माणूस जो मित्रांसोबत किंवा घरापासून दूर राहतो, तो थोड्या-फार फरकाने असाच करत असणार (जे नाहीत, त्यांचा खरच कौतुक!) म्हणजे खाण्यावर नसेल कदाचित पण पिक्चर म्हणा / कपडे म्हणा / भटकणं म्हणा.. कोणतीतरी गोष्ट नक्कीच प्रमाणाबाहेर करत असणार. कधी कोणाच्या आग्रहाखातर किंवा कधी आपोआप सवय होऊन गेली म्हणून. अर्थात पैसे कसे आणि किती खर्च करायचे हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे; पण given that you belong to a middle class family, कुठेतरी मनात हे कायम टोचत राहतं की ज्यांनी आपल्याला या लायक बनवलं त्यांना अजूनही त्याच परिस्थितीत ठेवून आपण मजा मारतोय. यात अजून एक गोष्ट देखील असते. बर्याचदा असं होतं की आपली आधीची पिढी तेवढी flexible नसते - उदाहरणार्थ, समजा तुम्ही ठरवलं की आपण आपल्यासाठी कपडे घेण्यावर एवढे पैसे खर्च करतो, आई साठी एक मस्त भारीतली साडी घेऊ- पण साडी दिली की तिची दुसरी रियाक्शन अशी असते की - केव्हढी महाग आहे - काय साड्या कमी आहेत होय मला? (अर्थातच पहिली रियाक्शन - वाः छान आहे, आवडली - अशीच असते :)) किंवा तुम्ही तुमच्या मित्रांना महागड्या हॉटेलात बर्थडे ट्रीट दिली म्हणून तुम्ही आई-बाबांना म्हणालात की चला आज तुमच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त घरी काही करण्यापेक्षा आपण पिझ्झा मागवू - तर ते बऱ्याचदा नाहीच म्हणतील. त्यांची आपल्याकडून यातली कुठलीच अपेक्षा नसते. आणि मग कधी कधी त्यांच्या या rigidness ला कंटाळून म्हणा किंवा काहीही, आपण आपल्याच आयुष्यात हे सगळे करत राहतो. पण मग आपलेपणाची मजा गमावून बसतो. सगळ्यांसमोर नातीचं कौतुक करणारी आजी miss करतो; आणि छान हसत खेळत, एकमेकांना मदत करत केलेल्या स्वयंपाकाची गोडी देखील miss करतो.

उगीच नाही, पिझ्झ्याचा समाचार घेतल्यावरदेखील "चिंच-गुळाची आमटी पाहिजे.." किंवा "मला मटार उसळ खायचिए.. आत्ता लगेच" असे स्टेटस मेसेजेस chat वर टाकत आपण! किंवा, westside / fab india मधून घेतलेले expensive कपडे सोडून traditional day ला घरून आईचीच साडी घेवून येत! उगीच नाही, कोणी गणपतीसाठी घरी गेलं की मोदकांची फर्माईश करत, आणि उगीच नाही "ही पुरणपोळी.. मराठी लोकांमध्ये करतात होळीला" असं म्हणून आपल्या समस्त अमराठी मित्र-मैत्रिणींना ती आग्रहाने खायला घालत! कधी कधी मला वाटतं, आपण अजिबात बदललो नाहीये.. आपले विचार अजूनदेखील आपल्या मध्यमवर्गीय कुटुंबाभोवातीच फिरत आहेत. :) आणि असं वाटलं की अचानक एक समाधान अनुभवायला मिळत! आपण अजिबात एकटे नसल्याचं!